Sunday, 9 September 2018

इव्होल्यूशनचं इव्यॅल्यूएशन

२४ नोव्हेंबर १८५९, चार्ल्स डार्विनचं 'द ओरिजीन ऑफ स्पिशीज्' पुस्तक प्रकाशित झालं आणि विज्ञान जगतात एकंच खळबळ उडाली. डार्विनने सजीवसृष्टीच्या विकासाची मांडलेली संकल्पनाच तशी होती, 'एकपेशीय सजीवांपासून सुरुवात होऊन आजची बहुपेशीय, जटिल संरचनेच्या सजीवसृष्टीची क्रमाक्रमाने रचना झाली';  ही कल्पनाशक्तीची अफाट झेप होती. कुठे ते एकपेशीय सुक्ष्मजीव, कुठे लहानसे किडे-किटक, वनस्पती नी सिंहासारखे अक्राळविक्राळ प्राणी आणि कुठे आजचा बुद्धिमान मानव.... आणि या सर्वांचा उगम एकाच प्रकारच्या सजीवांतून क्रमाक्रमाने झाला म्हणायचा ? छे छे... कसं मान्य करायचं राव ? हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन कोणीही असो; कुठल्याही धर्मातील तत्वज्ञानात असा काही उल्लेख नव्हता, उलट ईश्वराने कशी एकाच क्षणी सकलसंपन्न सजीवसृष्टी निर्माण करुन,  धर्मग्रंथ मानवाचे हाती देऊन माणसाला धर्माची शिकवण दिली आणि आमचाच धर्म नी धर्मग्रंथ कसे साक्षात ईश्वरी आहेत हे पटवून देण्यासाठी लोक एकमेकांच्या उरावर बसत होते. कुठे धर्मांध-श्रद्धाळू लोक, तर कुठे जिज्ञासू वैज्ञानिक सर्वांनी डार्विन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अभ्यासला. कोणी डार्विनवर जोरदार टिका केली, कोणी डार्विनच्या उत्क्रांतीवादातले खाचखळगे दाखवून पुढे चाचपणी करत निघाले. नास्तिकमतवाद्यांनी तर डार्विनचे आंधळे कोडकौतुक आरंभले, धर्मसंस्थांनी डार्विन कसा चुकीचा आहे, हे दाखवण्यासाठी हजारो पानांचे ग्रंथ खर्ची घातले. वैज्ञानिकांनी सजीवसृष्टीविकासाच्या इतरही कल्पना मांडल्या, त्यातून भिन्न मताचा म्हणून डार्विनवर टिकाही केली. दशकांमागून दशके उलटत गेली, नवीन संशोधन, अभ्यास यातून समोर येणारे निष्कर्ष  हळूहळू उत्क्रांतीवादाचीच पुष्टी करणारे मिळू लागले.
आज दिडशे वर्षांनंतर शास्त्रज्ञांनी विविध प्रयोगांच्या निष्कर्षावरुन आणि उपलब्ध जीवाश्म पुराव्यांवरून उत्क्रांतीवादावर शंका घेणे सोडून दिले आहे. उलट सजीवउत्क्रांतीशी निगडीत विविध ज्ञानशाखा आज जीवशास्त्रात निर्माण होत आहेत, वैद्यकीयशास्त्रात नवनवीन भर पडत आहे. कशी का होईना पण सजीवसृष्टीची सुरुवात एकपेशीय सजीवांपासूनच होऊन त्यांचा आजवर विकास होत आला आहे, हे आता वैज्ञानिक तथ्य आहे.

तरीही उत्क्रांती म्हणजे नक्की काय किंवा उत्क्रांतीवादावर इतरंही विविध शंका मला विचारल्या गेल्या, ती सर्व प्रश्नोत्तरे मी इथे संकलित करुन मांडत आहे, अनेकांच्या शंकांचे यामुळे समाधान होईल असे वाटते. कोणाला कदाचित हा लेख सलग वाटणार नाही; कोणाला काही विधानं मांडलेली पटणार नाहीत, मात्र मी सलग लेख लिहिण्याच्या उद्देशाने सदर लेखन केलेले नाही, ही विविध ठिकाणी वेळोवेळी झालेली चर्चाच संकलित केली आहे. कदाचित यावर नवीन प्रश्न उपस्थित होतील, त्यातून या लेखात अजून भर पडेल. तेव्हा सर्व शंकांचे व मतांचे स्वागतंच आहे


१.  प्रश्न - सजीव प्रतिकूल परिस्थितीत स्वतःमध्ये बदल घडवून आणतात व आपले अस्तित्व टिकवून ठेवतात, असे आपण म्हणता; 'सर्व्हायवल अॉफ द फिटेस्ट' असे उत्क्रांतीवादाचे समर्थक म्हणतात. मग जर जलचरांपासून उभयचर, भुचर अशी सजीवसृष्टी विकसित होत राहिली, तर लहान माशांसारखे जलचर आजवर टिकून कसे राहिले ? मग 'सर्व्हायवल अॉफ द फिटेस्ट' (जो सक्षम असेल तोच टिकून राहिल.) हे चुकीचे विधान नाही का ?

उत्तर-
खरंतर हे विधान मुळचे डार्विनचे नाही,हे विधान डार्विनचा सिद्धांत वाचून स्पेन्सर नावाच्या कोण्या व्यक्तीने केले,डार्विनने विशेष विचार न करता ते उचलून धरले;पण मुळात आपण म्हणता त्याप्रमाणे हे विधान अर्थहीन आहे.शास्त्रज्ञांनीही अर्थातच हे विधान वापरायचे बंद केले आहे.

त्याऐवजी 'प्राकृतिक निवड' (Natural selection) ही अधिक योग्य व्याख्या आहे.या आधुनिक व्याख्येनुसार -
स्वजातीचे अस्तित्व टिकवणे म्हणजे फक्त श्रेष्ठ जातीनेच टिकून राहणे किंवा आस्तित्वाच्या लढाईत इतर जातींविरूद्ध जिंकणे नव्हे तर भवतालच्या परिसरात मोठी उलथापालथ होत असताना (dramatic changes in environmental conditions) स्वतःस टिकवून ठेवणे.

आपल्यातली सारी जीवशास्त्रीय गुण-वैशिष्ट्ये ही आपल्या गुणसुत्रांवर अवलंबून असतात. गुणसूत्रे म्हणजे थोडक्यात पेशींच्या केंद्रकातील डिएनएच्या लांबलचक साखळ्यांचा एक गुंता ! गुणसूत्रे आपल्याला आपल्या आई-वडिलांकडून मिळत असतात. या डिएनएच्या रेणूचा एक छोटासा भाग म्हणजे जनुक (जीन - gene). या जनुकांमध्ये जे बदल होतात, त्याला म्हणतात 'म्युटेशन' (mutation). अशा पद्धतीने जनुके बदलली की गुणवैशिष्ट्ये बदलतात आणि ही जनुके पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित झाली, की नव्या गुणवैशिष्ट्यांसहीत ही नवी पिढी आणि त्यापुढील सर्व पिढ्या जन्माला येत राहतात. याचे अगदी सोपे उदाहरण 'अँटीबायोटीक रेझिस्टन्स' ! अर्थात आजार निर्माण करणाऱ्या सुक्ष्मजीवांच्या नवीन पिढ्यांनी स्वतःमध्ये बदल घडवल्याने त्यांच्यावर काही जुन्या प्रतिजैविक औषधांचा (antibiotics) आता परिणाम होत नाही; हे आजवर टिव्हीवर बातम्यांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये वा आपल्या डॉक्टरांकडून आपण ऐकलेच असेल. (प्रतिजैविकांचा अतिवापर टाळावा, तो यासाठीच !)

ही उत्क्रांती दोन प्रकारात विभागता येईल. मायक्रोइवोल्यून (microevolution)- सूक्ष्म बदल आणि मॅक्रोइव्होल्यूशन (macroevolution)-मोठे बदल. ड्रग रझिस्टन्ट बॅक्टेरीया,मलेरियाप्रवण भागातील ( अफ्रीका) माणसांच्या रक्ताच्या १५-२०%% लाल पेशींच्या आकारात बदल [नाॅर्मल लाल रक्तपेशी चकतीच्या आकाराच्या असतात,ज्यामध्ये मलेरियाचे पॅरासाइट्स राहू शकतात, म्यूटेशनने या रक्तपेशी कोयत्याच्या आकारात (sickle cell) बदलतात,ज्यामध्ये मलेरियाच्या परजीवींना राहता येत नाही.] असे अनेक बदल स्पष्ट दिसतात,ते नाकारण्यात अर्थ नाही,असेच छोटे मोठे जनुकीय बदल मोठ्या काळात संपूर्ण 'जीन पूल' मध्ये बदल घडवून आणतात, ज्याला मॅक्रोइव्होल्यूशन म्हणतात, उदा. ट्रीओडल या उडत्या डायनोसोरमध्ये उत्क्रांती होत पिसं येणे.

जर काही सजीवांचा विकास होऊन भिन्न प्रजाती बनतात, तर मुळच्या जुन्या प्रजाती नष्ट का होत नाहीत ? किंवा या जुन्या प्रजातींमध्ये उत्क्रांती होऊन आता नवीन प्रजाती बनताना का दिसत नाही हा या प्रश्नाचा उपप्रश्न आहे, त्याचे उत्तर असे -

'सर्वहायव्हल अॉफ द फिटेस्ट' हे विधान शुद्ध वैज्ञानिक नाही. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असताना ज्यांनी स्वतःमध्ये बदल केला, तेच सजीव इतर सजीवांच्या तुलनेत टिकून राहिले. याचा अर्थ सदासर्वकाळ सर्व परिस्थितींत हेच सजीव टिकून राहतील, असा घ्यायचा नसतो. या कालबाह्य विधानाला घट्ट पकडून ठेवल्याने ही गोची झाली आहे.इथे प्रश्न आहे प्राकृतिक निवडीचा. अचानक आलेल्या प्रतिकूल परिस्थितीत जे टिकले, ते उरले बाकी गेले.(अचानक आलेली परिस्थिती म्हणजे सहा-महिने वर्षाचा काळ नव्हे)
आजवर पृथ्वीवर असलेल्या एकूण प्रजातींपैकी ९९% प्रजाती पूर्णतः नष्ट झाल्या आहेत, होणाऱ्या बदलांना त्या तोंड देऊ शकल्या नाहीत.

जलचर,सरिसृप,सस्तन प्राणी यांनी स्वतःमध्ये बदल घडवून,अनुकूल परिस्थितीत जाऊन स्वतःला टिकवले आहे. उदा. एका भूभागात पाण्यात राहणे विशिष्ट परिस्थितीत अशक्य झाल्यावर जमिनीवर येण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला.कारण जमिनीवर तेव्हा अनुकूल परिस्थिती होती;
पण ही घटना म्हणजे एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीवर घडली आणि सर्व मासे जमिनीवर एकदम धावायला लागले असं नाही.जिथे जेवढ्या काळापुरता जशी गरज लागली,तिथे तसे बदल घडत गेले,सजीवसृष्टी पसरत गेली,स्वतःचे अस्तित्व टिकवत राहिली. (opportunistic expansion into empty ecological niche)

सजीवांमध्ये जनुकीय बदल घडतच असतात(चांगले किंवा वाईट), जे बदल अस्तित्व टिकवण्यास मदत करतात,ते पुढच्या पिढ्यांमध्ये प्रजननातून संक्रमित होत रहातात, छोट्याछोट्या बदलांतून मोठे बदल घडतात, हे मात्र प्रायोगिक तत्वावर सिद्ध झालेले आहे.

२. प्रश्न - सर्व सजीवांमध्ये केवळ माणसाचाच मेंदू इतका प्रगत व तल्लख कसा ?

उत्तर - हा प्रश्न जिराफाचीच मान इतकी लांब का, हत्तीचेच नाक इतके मोठे असे का; याप्रकारचा आहे. प्रत्येक सजीव प्रजातीकडे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य आहे, ज्याद्वारे ते आपले अस्तित्व टिकवून धरतात. राहता राहिला मेंदूचा प्रश्न तर,
मेंदूच्या विकासाचे तीन टप्पे आढळतात.
i.अॅर्कीकोर्टेक्स (Archicortex)
ii.पॅलिओकाॅर्टेक्स (Paleocortex)
iii.निओकाॅर्टेक्स (Neocortex)

यापैकी निओकार्टेक्स सध्या सर्वाधिक प्रगत तर अॅर्कीकाॅर्टेक्स सर्वात अप्रगत आहे.हे तिन्हीही टप्पे विविध सजीवांमध्ये आढळतात.यापैकी मनुष्याच्या मेंदूचा सर्वाधिक म्हणजे ९०% भाग निओकाॅर्टेक्सने व्यापला आहे,म्हणून तो हुशार,तरी इतर दोन टप्प्यांतील मेंदूही मानवात असतो,तसा निओकाॅर्टेक्स इतर जीवांतही कमी अधिक आढळतो,त्यामुळे एकटा मानव हुशार आणि बाकी सारे एकजात निर्बुद्ध अशी विभागणी नाही करता येत.ज्या प्रतिकुल परिस्थितीने 'एका भुभागातील' एप्स ना झाडावरून जमिनीवर आणले,त्याच परिस्थितीने अस्तित्वाच्या लढाईत मेंदूचा वापर करण्यास शिकवले. (Natural selection and opportunistic expansion in empty ecological niche !!!)

३. उत्क्रांती सिद्ध करण्याइतपत भुतकाळातील जीवाश्म पुरेसे मिळालेले नाहीत.

उत्तर-
नुसते आजवर मिळालेले मानवी जीवाश्मंच सुमार सहा हजार आहेत. इतर सजीवांचे मिळून लाखो जीवाश्म आपल्या हाती लागले आहेत. हा आकडा थोडा-थोडका नव्हे. हे जीवाश्म उत्क्रांतीचे मधले टप्पे दाखवतात.

४. प्रश्न - उत्क्रांतीचे वर्तमानाकाळात काहीच पुरावे मिळत नाहीत का ?

उत्तर-
नाही, असं काही नाही. आता मी काही वैज्ञानिक तथ्ये सांगतो. त्याव्यतिरिक्तही पुढे काही बाबी सांगणार आहेच -
आता प्रायोगिक अभ्यासातून सिद्ध झालेल्या (तर्कावर मांडलेल्या नव्हेत) गोष्टी -

#.सर्व सजीवांमध्ये जवळपास साडेतीनशे जनुके एकमेकांशी साम्य दाखवतात.

#.अगदी उंदरासारख्या प्राण्यांशीही माणूस जनुकीय पातळीवर ९०% साम्य दाखवतो.

#.जनुकीय अभ्यासावरून सर्व मानवजात ही अफ्रिकेतूनंच पसरली हे सिद्ध आहे; किंवा मनुष्याची/ सर्व सजीवांची निर्मिती एकाच ठिकाणी कुठे झाली असे मानले; तरी आज विविध खंडांत राहणाऱ्या मानव जातीतच नव्हे तर सर्व जीवमात्रांत तेथील पर्यावरणाला अनुसरून बदल कसे झाले ?

#.शरिरातील उर्जाकेंद्र-मायटोकाॅन्ड्रीआॅन या पेशीतील अवयवाकडे चक्क स्वतःचा डिएनए असतो.(प्रत्येक पेशीत केंद्रकात डिएनए असतो, पेशीतील इतर अवयवांमध्ये नाही)
या मायटोकाॅन्ड्रीआचा अभ्यास केल्यावर त्याचे रिकेट्सीआ या प्रोकॅर्योट बॅक्टेरिआशी साधर्म्य दिसतं. हे प्रयोगातून सिद्ध झालेलं आहे. हे अनेक पेशी एकत्र येऊन सुसूत्रतेने काम करू लागल्याचं उदाहरण आहे
निसर्गात अशी असंख्य उदाहरणे आहेत.माझ्या आतड्यातील जीवाणू मला अन्न पचवण्यास मदत करतात,त्याबदल्यात मी त्यांना हव्या त्या स्वरूपात पोषण देतो.पण त्यासाठी आम्ही दोघांनी एकत्र बसून एकमेकांचे प्रस्ताव मांडून चर्चा केली नव्हती.मेंदू नाही म्हणून सहजीवन अशक्य असे म्हणता येत नाही.


उत्क्रांतीवादाच्या विरोधकांनी पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत -

१. आपल्या कंबरेचे हाड ज्याला 'पेल्व्हीस' म्हणतात ते वॉशबेसिनच्या आकाराचे असते. (पेल्व्हीस या शब्दाचा अर्थंच 'बेसिन' होतो) आता या बेसिनच्या वरच्या रुंद भागात मुत्राशय, गर्भाशय(स्त्रियांमध्ये), आतडे व गुदाशय 'ठेवलेले' आहेत. तर खालच्या अरुंद भोकातून गुदाशयाचा खालचा भाग,योनी व मुत्रनलिका बाहेर काढून त्यांना स्वतंत्र द्वारं (openings) दिले आहेत.

एक मानव वगळता अन्य कोणीही प्राणी पुर्णपणे दोन पायांवर ताठ उभा राहून चालू शकत नाही. त्यामुळे हे पेल्व्हीस माणसात किंचित तिरपे आणि छोटे असते. याउलट इतर चतुष्पाद व चिंपाझीसारख्या प्राण्यांमध्ये ते तुलनात्मक दृष्ट्या मोठे असते. याउलट माणसांमध्ये जन्माला येणाऱ्या बाळाचे डोके तुलनेने बरेच मोठे असते. उदाहरणासाठी व तुलनेसाठी मी सोबत एक फोटो जोडत आहे. खाली बाजू-बाजूला चिंपांझी व मनुष्याचे पेल्व्हीस व त्यामध्ये त्यांच्या बाळांच्या कवटीचे चित्र आहे. बाहेरची आउटलाईन म्हणजे पेल्व्हीस व आतमध्ये दाखवलेली अंडाकृती आकृती म्हणजे बाळाची कवटी, हे वरतून पाहिल्यावर दिसणारे चित्र आहे. (म्हणजे बेसिनच्या बरोबर वर लावलेल्या नळाला बेसिन जसं दिसत असेेल तसं तुम्हाला आता पेल्व्हीस दिसतंय) बाळाची कवटी व पेल्व्हीस यांमधील काळा  रंग रिकामी जागा दाखवतो. आता नीट निरीक्षण करा, चिंपाझीच्या (p. troglodytes) पेल्व्हीसची 'आउटलेट' आणि बाळाची कवटी या दोहोंमध्ये बरीच जागा शिल्लक राहते, तर मानवी बाळाची कवटी आईच्या पेल्व्हीसमध्ये जेमतेम मावते, मोकळी जागा अशी दिसतंच नाही. अजून अतिशय महत्वाचा भाग सांगतो; कवटीवर जी मार्कींग दिसत आहे, त्यावरुन व्यवस्थित निरीक्षण केलं तर लक्षात येईल चिंपाझीचं बाळ सरळ चटकन बाहेर निघते, तर मानवी बाळ अगदी वरपासून (इनलेट मग मिडप्लेन आणि मग आउटलेट) कसबसं प्रत्येक वेळी  स्वत:भोवती फिरत खाली येतंय. (वैद्यकीय भाषेत या बाळाच्या स्वत:भोवती फिरत बाहेर येण्यालाच 'मेकॅनिजम अॉफ लेबर' असं म्हणतात; असा प्रकार केवळ मानवातंच दिसतो.) आता एक शेवटचं उदाहरण देतो. समजा, एक सात इंच व्यासाचं भोक पाडलं, तर त्यातून क्रिकेटचा बॉल काढणं सोपं की फुटबॉल काढणं सोपं असेल ? या उदाहरणात फुटबॉल अशा भोकाच्या आरपार काढणं किती जिकरीचं काम असू शकेल लक्षात येतंय का ? पेल्व्हीसमध्ये जेमतेम मावणारं बाळ अशा अरुंद जागेत स्वत:भोवतीच फिरवत बाहेर काढणं असंच जिकरीचं काम असतं !!



हे असं असूनसुद्धा माणसामध्ये इतर प्राण्यांसारखी अगदी सहज प्रसुती होते, असं आपल्याला वाटत असेल तर तो आपला गैरसमज आणि अज्ञान आहे.


माझा प्रश्न हाच आहे.. माणसाच्या शरीररचनेत ही अशी चूक कशी झाली ? निर्मितीच्या वेळेसंच अचूक शरीररचना प्राप्त का झाली नाही ? प्रश्न हा वेदना वा दु:ख सहन करण्याचा नाहीच, प्रश्न हा आहे, की शरीर बनताना त्यात अशा त्रुटी का राहिल्या ? कोणी म्हणेल मानव हा श्रेष्ठ प्राणी आहे म्हणून किंवा कर्माचे फळ म्हणून ! तर ईश्वर कर्माचे फळ देण्यासाठी स्वत:ची रचना जाणुनबुजून दोषपुर्ण बनवेल का ?

कोणी म्हणेल, आधुनिकीकरणामुळे अलीकडे प्रसुती गुंतागुंतीची होते. मधुमेह,लठ्ठपणा यांचे वाढते प्रमाण या अनुषंगाने चिंताजनक आहे खरे; पण आपण म्हणता त्या दृष्टीने नव्हे ! कोणाला वाटते श्रमाची कामे करणाऱ्या स्त्रियांची प्रसुती सदासर्वकाळ सोपी होते.

मग आता आपण तुमच्या-माझ्या किंवा अन्य कोणाच्या वैयक्तीक अनुभवांपेक्षा जागतिक आरोग्यसंघटनेचे (WHO) आकडे काय म्हणतात पाहू.

-दररोज जगभरात ८३० माता या प्रसुतीवेळी दगावतात.

- यापैकी ९९% मातामृत्यू हे विकसनशील देशांत होतात.

- १९९० ते २०१५ मातामृत्यूदर हे ४४टक्क्यांनी कमी झाले आहेत.


आता मला सांगा,

i.एक नैसर्गिक प्रक्रीया इतकी जीवावर का ओढवली जाते?

ii.हे आधुनिकीकरणाचे परिणाम म्हणावेत तर आधुनिक देशांऐवजी हे प्रमाण विकसनशील देशात अधिक का ?

iii. १९९० पासून जसेजसे आधुनिकीकरण वाढत गेले तसेतसे मातामृत्यूचे प्रमाण कमी का होत गेले ?


प्रश्न मानवी जन्माशी निगडीत असल्याने इथे विचारवंताना,तत्वज्ञान सांगणाऱ्यांना पुष्कळंच वाव आहे, त्यामुळे याव्यतिरिक्त काही क्षुल्लक रचनांमधल्या चुका आता पुढे सांगतो.


२. हे दुसरे उदाहरण -

अक्कलदाढ

वय वर्ष १७ ते २५ याकाळात येणारी दाढ..


अनेकांना ती येताना प्रचंड दुखतं, दंतवैद्यांना या दाढेसाठी हस्तक्षेप करुन कधी या दाढेसाठी जागा करावी लागते; कोणाची दाढ येतानाच काढून टाकावी लागते.


का माहितेय ?


एक विचित्र गडबड झाली आहे.. इतर प्राण्यांप्रमाणे आपल्याला जास्तीचा दात तर आहे पण त्यामानाने मानवी जबडा मात्र लहानंच आहे* त्यामुळे कोणाकोणाला दात येताना प्रचंड दुखतं, कोणाचा दातंच काढावा लागतो, कोणाचा दात आयुष्यभर जबड्याच्या हाडातंच राहतो.. अलीकडे सुमारे ३५-४०% लोकसंख्येत आता अक्कलदाढं बनतंच नाही (अजेनेसीस) , त्यातही हे बदल दिसणारे लोक जनुकियदृष्ट्या एकमेकांशी संबंधित आहेत असं दिसतं..


सांगा आता,

सर्वज्ञानी निर्माता मनुष्य निर्माण करत असताना जबड्यात मावणार नाहीत, कधी आपलं कार्य बजाविण्यासाठी पुर्ण बाहेरच येऊ शकणार नाहीत, वा कधी प्रचंड वेदना होतील इतके दात देईल का ? जर हा दोष नव्हता, यापासून काही अपाय नव्हता असे आपल्याला वाटत असेल, तर मग त्याचे प्रमाण आता जनुकीयदृष्ट्या निगडीत लोकसंख्येत कमी कसे होऊ लागले ?


३. उदाहरण तिसरे-

आपल्या श्वासनलिकेच्या वरच्या टोकाला एक अवयव आहे, ज्याला आपण स्वरयंत्र (voice box / adam's apple/ larynx) असे म्हणतो. आता मेंदूतून येणाऱ्या 'व्हेगस' नावाच्या एका नर्व्हची शाखा जी रिकरन्ट लॅरिन्जीयल नर्व्ह या नावने ओळखली जाते ती बाहेर येऊन संदेशवहनासाठी या स्वरयंत्राला सप्लाय करत असते.

आता विविध प्राण्यांमध्ये या रिकरन्ट लॅरिन्जीयल नर्व्हची रचना पाहू -

माशांमध्ये श्वासनलिकेच्या या वरच्या टोकाकडील अवयवाला 'गिल्स'(gills) असं म्हणतात; यातील तारांची उघडझाप करुन मासे अधिक परिणामकारकरितीने ऑक्सिजन-कार्बनडायऑक्साइडची देवाणघेवाण करतात, तर मोकळ्या हवेत अशाच तारांचा वापर  करुन इतर सजीव आवाज निर्माण करतात. मात्र माशांमध्ये मान हा अवयव नसतोच आणि मेंदू, हृदय व गिल्स हे सारे अवयव जवळजवळ असतात. त्यामुळे मेंदूतून निघालेली तार हृदयाच्या मागून थेट या 'गिल्स'पर्यंत जाते. पुढे जमिनीवर प्राण्यांना मान हा अवयव दिसू लागला; मेंदू वर आणि हृदय बरेच खाली आणि स्वरयंत्र दोघांच्या मध्ये राहिले. पण गंमत पहा, रिकरन्ट लॅरिन्जीयल नर्व्हने आपला मार्ग बदलला नाही; ती आजंही मेंदूपासून हृदयापर्यंत खाली येते, हृदयाच्या महाधमनीला वळसा घालून मग स्वरयंत्रापर्यंत परत वर जाते. वास्तविक कुठल्याही अवयवाचा मेंदूशी संपर्क राखणारी नर्व्ह हा कितीतरी महत्वाचा अवयव असतो, उद्या तिला काहीही दगाफटका झाला, तर अवयव मेल्यातंच जमा होतो बापडा ! आता समजा निर्मात्याने एक-एक सजीव स्वतंत्र बनवला असता, तर अशा महत्त्वाच्या अवयवाचा मार्ग शक्य तितक्या सोप्या मार्गाने असा यूटर्न न घेता थेट आखला असता. रिकरन्ट लॅरिन्जीयल नर्व्हच्या अशा विनाकारण लांबवलेल्या कोर्समुळे तिला इजा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते आणि तशी इजा बरेचदा होतेसुद्धा! आता माशांमध्ये केली ती रचना बरोबरंच आहे हो, पण याच रचनेप्रमाणे जिराफासारख्या प्राण्यांमध्ये तर हीच नर्व्ह तब्बल पंधरा फुटांपर्यंत लांब असते आणि अशी रचना अनावश्यक व सदोष ठरते.

याचं सोपं कारण असंच आहे, की गरज पडल्यावर उत्क्रांत असताना, सजीवांच्या शरीराचा मुळ आराखडा तोच राहिला, फक्त नॅचरल सिलेक्शनला अनुसरुन काही बदल होत राहिले !

याव्यतिरिक्त अपेंडिक्स, प्रोस्टेट ग्लॅन्ड, फुफ्फुसातील लिंग्यूला, प्रोनेटर टेरेस नावाचा स्नायू असे बरेच रचनाशास्त्रदृष्ट्या दोष दिसतात, कि जे थेट मानव किंवा कोणताही सजीव स्वतंत्रपणे निर्माण करायला घेतला असता, तर होण्याचे काही प्रयोजन नव्हते !

उत्क्रांती न मानणाऱ्यांचा मतप्रवाह साधारण असा असतो, ईश्वराने सजीवसृष्टीची निर्मिती ती सध्या आहे तशाच अवस्थेत अमुक एक वर्षांपुर्वी केली त्यात विकास होत नसून ऱ्हास होत आहे; पण मग अशावेळी ही निर्मिती तेव्हापासून निर्दोष असायला हवी आणि त्यात मागाहून दोष निर्माण होताना दिसले पाहिजेत. पण प्रत्यक्षात उलट प्रकार दिसतोय, जुन्या डिझाईन मध्ये दोष दिसत आहेत !

शरीररचनेतील हे दोष सुर्यप्रकाशासारखे लख्ख आहेत.. त्यामुळे ते नाकारणे हे तर डोळे बंद करण्यासारखे आहे.. त्यामुळे किमान सकलसंपन्न जीवसृष्टी ईश्वराने निर्माण केली आणि तिथून पुढे तिचा विकास होत नसून ऱ्हास होत आहे हा चुकीचा सिद्धांत ठरतो.

उलट सजीवसृष्टीची सुरुवात एकपेशीय सजीवांपासूनंच होऊन पुढे उत्क्रांतीवाद सांगतो त्याप्रमाणे प्रकृतीतील काही गुण-दोषांसकट सजीवसृष्टीचा प्रवास चालू आहे हे मान्य करावेच लागेल !


- ©डॉ. सागर पाध्ये


(लेखनाचे हक्क लेखकाकडे राखीव असून,लेखकाच्या नावाशिवाय लेख अन्यत्र प्रसारीत केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)

अॅटीबायोटीक्स !

कोविडमुळे झालेल्या एकूण मृत्यूपैकी ६०% मृत्यू हे केवळ अॅन्टीबायोटीकच्या अतिवापरामुळे झालेत, अशी एक बातमी आहे. या दुर्दैवी बातमीत तथ्य असणार,...